Monday, July 13, 2026

"वेलकम बॅक!"

 

"वेलकम बॅक!"

"वेलकम बॅक!"

रडता रडता...

डॉक्टरांचे शब्द कानावर पडले.

माझंच स्वागत होत होतं.

क्षणभर प्रश्न पडला...

यांना कसं काय माहीत की मी पुन्हा आलोय?

मूर्ख मेंदूने जागेचं भान ठेवलं नाही आणि लगेच भोकाड पसरलं.

जागा अशी होती की माझा श्वास नुकताच सुरू झाला,

किंवा कदाचित...

पुन्हा सुरू झाला असावा.

म्हणूनच बहुतेक "वेलकम बॅक" म्हटलं असावं.

अजून अंगावर आईची ऊब होती.

पण मेंदू स्वस्थ बसणाऱ्यांतला नव्हता.

त्याने लगेच प्रश्न विचारला —

"आपण या आधी कधी इथे आलो होतो का?"

मी आठवायचा प्रयत्न केला.

पण काहीच आठवेना.

मग वाटलं...

जाऊ दे.

कशाला द्यायचा त्रास?

या थंडीत चांगली ऊब मिळाली होती.

मायेची कूसच ती होती.

आणि पहिली भेट जर "वेलकम बॅक!" 

या वाक्याने होणार असेल...

तर होऊ दे.

आता...

थोडावेळ रडूया.

मग शांत झोपूया.

Saturday, July 11, 2026

मिसिंग लिंक

 

मिसिंग लिंक

एक वेडा विचार आला...

जावं ह्या रिमझिम पावसात भिजायला.

छत्री नको..मित्र नको...

रेनकोट नको...मैत्रीण नको...

फक्त पावसाशी दोन शब्द बोलायला.

पण पावसानेच विचार बदलला

रिमझिमचा रौद्रावतार झाला

मुंबई भिजली...

तुडुंब भरली...

आणि बघता बघता कुठे बुडाली नाही कळलं.

शाळा बंद.

कॉलेज बंद.

ऑफिस बंद.

"वर्क फ्रॉम होम"ची घोषणा झाली.

या पावसाने काय काय केलं!

वाहून गेले रस्ते...

बंद पडल्या गाड्या...

थांबल्या रेल्वे...

उडाली नाहीत विमानं!

पण...

मात्र गोष्ट एक  चांगली झाली.

आई-वडिलांची पुन्हा ओळख मुलांशी झाली.

...आणि मिसिंग लिंक घरात सापडली.

इतक्यात ब्रेकिंग न्यूज आली...

"हरवला... हरवला... मिसिंग लिंक हरवला!"

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेला

आत्ताच मोठ्या दिमाखात लोकार्पण  झालेला

तोच, तो.

ह  र  व  ला

सापडल्यास त्वरित कळवावे.

पहिले बक्षीस...

नवीन पूल बांधण्याचे कंत्राट!

मी मात्र विचारात पडलो.

खरंच हरवला तो मिसिंग लिंकच होता का?

तसं...

आपण अनेक मिसिंग लिंक्स हरवत आलो आहोत?

माणूस आणि निसर्ग...

आई-वडील आणि मुलं...

शेजारी आणि पाजारी...

विकास आणि नियोजन...

सगळीकडेच...

कुठे ना कुठे...

एक मिसिंग लिंक आहे.

पावसाने फक्त...

सगळ्यांना जागं केलं.

सांभाळा...

आपापले मिसिंग लिंक्स.

माझं पावसात भिजायचं स्वप्न तसंच राहिलं.

घरी येताना नकळत ओठांवर जुनं गाणं आलं...

"रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेला...

पाणीच पाणी चहूकडे...

बाई... मिसिंग लिंक गेला कुणीकडे?"

Wednesday, July 8, 2026

एक होता धबधबा


धबधबा





एक होता धबधबा.

तो रोज एका उंच डोंगरावरून कोसळत असे. वरून खाली येताना डोंगरातील खाचखळग्यांतून वाट काढत, छोट्या-मोठ्या दगडांवर आपटत, तुषार उधळत तो खाली येत असे.

एके दिवशी वाटेत झाडावर बसलेल्या कावळ्याने विचारले,

"अरे मित्रा, रोज पडतोस... दगडांवर आपटतोस... दुखत नाही का? हा हट्ट कशासाठी?"

धबधबा खळखळला.

"मित्रा, तू कधी असा विचार केलास का की त्या दगडांमुळेच माझे तुषार जन्माला येतात?"

कावळा थोडा गोंधळला.

धबधबा पुढे म्हणाला,

"मी एका सुंदर मोहिमेवर असतो."

"कोणती?"

"खाली माझी वाट पाहणारी माणसं माझ्याकडे काही क्षण बघतात... 

आणि काही क्षणांसाठी त्यांची दुःखं, चिंता, थकवा विसरून जातात.

मी खाली येईपर्यंत पाणी असतो...

पण त्यांच्या चेहऱ्यावर पोहोचेपर्यंत आनंद झालेलो असतो.

म्हणूनच मी हा हट्ट सोडत नाही.

त्यांच्या आनंदातच मला माझा आनंद सापडतो."

कावळा काही क्षण शांत राहिला.

मग त्याने पंख हलवले...

आकाशाकडे पाहिले...

आणि मोठ्याने ओरडला—

"काव... काव..."

कदाचित ती त्याची दाद होती.

किंवा...

त्या मोहिमेत सामील होण्याचा त्याचा छोटासा प्रयत्न.


जगात अनेक धबधबे असतात.

बाहेरून पाहणाऱ्यांना ते सतत दगडांवर आपटताना दिसतात.

पण त्यांना माहीत असतं...

ते पडत नसतात.

ते कोणाच्या तरी आयुष्यात काही क्षणांचा आनंद निर्माण करत असतात.

बहुधा म्हणूनच काही धबधबे कधी थांबत नाहीत.

Tuesday, June 30, 2026

रिकाम्या जागा भरा

 

रिकाम्या जागा भरा

सर्व काही मिळालं.

सर्व काही अनुभवायला मिळालं.

आयुष्य माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेलं.

काय काय?

बालपण गेलं.

शाळा गेली.

कॉलेज गेलं.

जाहिराती गेल्या.

ऑफिसं गेलं.

मित्र गेले.

काही चेहरे गेले.

काही पत्ते हरवले.

काही रस्तेही हरवले.

मग वाटलं...

आता उरलं तरी काय?

पण आयुष्याला बहुतेक रिकाम्या जागा फार काळ आवडत नसाव्यात.

मग येतं...

आणखी काही.

एक नवीन मित्र.

एक नवीन ओळख.

एक नवं पुस्तक.

एक नवा विचार.

एक नवीन सकाळ.

किंवा एखादी हसरी खेळकर झुळूक.

 शाळेच्या बरोबर.

इयत्तांची जोड आली.

गेल्या वर्गांचं ओझं कमी झालं.

आणि लक्षात आलं...

आयुष्य असंच असतं.

ते कधीच पूर्ण रिकामं होत नाही.

ते सतत काहीतरी घेऊन जातं.

आणि नकळत काहीतरी ठेवूनही जातं.

आपल्याला कळतं ते फक्त जाणं.

येणं मात्र नेहमी शांतपणे होत असतं.

म्हणून कदाचित...

सर्व काही जात नाही.

आणि सर्व काही राहतही नाही.

मध्ये कुठेतरी...

"आणि बरेच काही..."

असं काहीतरी कायम उरतं.

Sunday, June 28, 2026

हसरी खेळकर झुळूक

 

हसरी खेळकर झुळूक

रविवार सकाळ.

लवकर जाग आल्यामुळे बाल्कनीत गार वाऱ्याच्या झुळुकेशी बोलत उभा होतो. ती ऐकत नसावी. नाहीतर थांबली असती. पण नाही. तिचं येणं-जाणं मलाही सुखावह वाटत होतं.

हळूहळू तांबडं फोडत अरुणोदय महाराज, सूर्याजींना रथातून घेऊन येत होते. क्षणभर सूर्याजींना नमस्कार करून दर्शन घेतलं...

आणि अचानक मेंदू घसरला.(तो सरळ रस्त्याने फारसा चालतच नाही.)

माझ्या एका जिवाभावाच्या मैत्रिणीशी फोनवर झालेल्या संभाषणाकडे.




तसं पाहिलं तर त्या संभाषणाला काही अर्थ नव्हता... आणि म्हणूनच ते इतकं सुंदर होतं.

तिच्याकडून स्वतःचीच स्तुती सुरू होती आणि ती माझ्या कानावर आदळत होती.

किती वेळ ऐकली, विचारू नका. शेवटी थोडा वैतागून मीच तिला थांबवलं.

"ऐक...

तू मोठी... तुझी बुद्धी मोठी...

मी लहान...माझी बुद्धी लहान.

तुझं हृदय मोठं. ते म्हणतात ना... दिल दरिया... की काय ते.

आणि माझं?तुझ्या हृदयापुढे लॅपटॉपवर दिसणाऱ्या त्या छोट्याशा ❤️ इमोजीएवढंसुद्धा नाही.

आणि ऐक...

तुझ्याशी माझी तुलना करणं म्हणजे मुंगीने हत्तीला म्हणावं—'मी तुझ्यापेक्षा जास्त वजन उचलते!'

तू आहेस तशीच मोठी राहा.

मला लहान असल्याचं अजिबात दुःख नाही.

कारण...

साधं आणि सोपं सांगायचं तर...तू माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस."

क्षणभर शांतता.

मग मी म्हटलं, "एक पी. जे. मारू?"

"मार."

"ऐक...

माझ्या भावाचं नाव 'जिवा' आहे."

क्षणभर शांतता...

आणि मग ती खळखळून हसायला लागली.

मीसुद्धा.

झुळूक मात्र सगळं ऐकूनही काही न बोलता हसत फिरत होती.

Thursday, June 25, 2026

पुढच्या गुरुवारी

 हॅलो! कसा आहेस? बरा आहेस ना?



मग झालं. मी...  मी सध्या बाल्कनीत उभा आहे.


माउंट फुजी पाहतोय.

खरंच... घाबरू नकोस. माझी तब्येत अजून बरी आहे.

दार्जिलिंग, जपान किंवा हिमालयात जायचीही गरज पडलेली नाही.

तो इथूनच दिसतोय. माझ्या बाल्कनीतून.थोडी कल्पनाशक्ती आणि थोडं मावळतीचं ऊन मिळालं 

"इथून पाहिलंसकी समोरचा डोंगर अगदी माउंट फुजीसारखा दिसायला लागतो..."

 "बरं! सांग, तुझ्याकडे वेळ आहे का?"

"आहे. आकाशाएवढा." "म्हणजे?""सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत."

"राईट. ठीक आहे. मी येतो पुढच्या गुरुवारी. तयार रहा मात्र.

"वाट पाहता पाहता मला उशीर झाला तर?"

"जा निघून. तू वाट तरी किती पाहणार?" "तू काय, मी काय? वाट पाहता पाहता म्हातारे होणार..."

"झालोच आहोत."

"इतका थोडाच उशीर होणार?" "झाला तर जास्तीत जास्त अठरा मिनिटं." 

"अठराच का?" "सव्वीस का नाही?"

"माहीत नाही." "बहुतेक मेंदूने अठरा हा आकडा काढून माझ्या हातात ठेवला असावा."

"अलिकडे तो असले उद्योग करतो."

ट्रॅफिकवर आपलं थोडंच नियंत्रण असतं. आजकाल बघावं तिथे उशीरच करतायत. 

गाडी असो.ट्रेन असो.वा घोडा असो. अलिकडे सूर्योदयाची वेळ निघून गेली तरी सूर्याजी  महाराजांचा पत्ता नसतो. 

युद्धाच्या धुरामुळे वाट सापडत नसावी.

नाहीतर एवढा उशीर कशाला?

हल्ली  उबर करणाऱ्यालाही उबर मिळेपर्यंत उशीरच होत असतो.

अरे गाढवा, जागा हो!

मेंदू तुझा पूर्ण विस्कटलाय."

पण काही झालं तरी पुढचा गुरुवार लक्षात ठेव.

दत्तजयंती देखील आहे."

"नक्की!"

"उशीर करू नकोस हं."

"प्रयत्न करीन."

"प्रयत्न नाही. ये."

"नक्की!"पुढच्या गुरुवारी, मी बाल्कनीत उभा आहे,माउंट फुजी पाहत.

वाट पाहत. किंवा कदाचित वाट न पाहताच.

Tuesday, June 23, 2026

आनंदाचे बीज

आनंदाचे बीज

काही माणसं आयुष्यात येतात आणि निघून जातात. 

काही दिवसांनी त्यांची नावंसुद्धा आठवत नाहीत. 

काही जण असे असतात की ते निघून गेल्यानंतरही 

त्यांची उपस्थिती आपल्या मनात कुठेतरी रेंगाळत राहते.

आमच्या गावात  एक असाच एक माणूस आला होता.

तो एका जुन्या बैलगाडीतून आला. गाडीवर एक विचित्र फलक लटकत होता

(हा माणूस खरंच आमच्या गावात आला होता की माझ्या मनात, हे आज सांगता येणार नाही. पण त्याने विचारलेला प्रश्न अजूनही माझ्या मागे फिरतो. आनंद मिळवायचा असतो की आठवण करून द्यायची असते?)

"आनंद विकत मिळेल."

गावकऱ्यांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

"आनंद कुठे विकत मिळतो?" कुणी हसत विचारलं.

पण तो माणूस फक्त हसला.

"मी आनंद विकत नाही," तो म्हणाला, ""मी आनंद विकत नाही," तो म्हणाला, 


"लोकांच्या मनात आधीपासून असलेल्या आनंदाची फक्त त्यांना आठवण करून देतो.""

त्याच्या गाडीत काही विलक्षण नव्हतं. काही रंगीत काचा, 

काही दुमडलेले कागद, काही मातीच्या चकत्या. 

जणू एखाद्या जुन्या खचखोळात वर्षानुवर्षे साचलेल्या वस्तूंचा खजिनाच.

पण त्या प्रत्येक वस्तूत एखाद्या आठवणीची, एखाद्या भावनेची किंवा 

विस्मरणात गेलेल्या आनंदाची दारं उघडण्याची ताकद होती.

गावाच्या टोकाला राहणाऱ्या एका एकाकी स्त्रीने 

त्याच्याकडून एक चिठ्ठी घेतली. त्यावर लिहिलं होतं,

"दिव्याची गरज नसली तरी एक दिवा लावून ठेवा. आणि एखाद्याचं नाव प्रेमाने घ्या, जरी तो ऐकण्यासाठी जवळ नसला तरी."

त्या रात्री तिने अनेक वर्षांनी आपल्या दिवंगत नवऱ्याचं नाव मोठ्याने घेतलं. दु:खाने नाही, तर कृतज्ञतेने.

आणि इथूनच मला त्या गोष्टीचा खरा अर्थ समजू लागतो.

आपण बहुतेक जण आनंदाच्या शोधात असतो. पण गंमत म्हणजे 

तो शोधताना आपण त्याला सतत आपल्यापासून दूर ढकलत असतो. 

आपल्याला वाटतं, अजून थोडे पैसे मिळाले की आनंद येईल. 

अजून थोडं यश मिळालं की आनंद मिळेल. लोकांनी आपली दखल घेतली की, 

आपली स्वप्नं पूर्ण झाली की, आपल्याला हवं ते मिळालं की आपण आनंदी होऊ.

पण आयुष्य वारंवार वेगळंच काहीतरी शिकवतं.

आनंद बहुतेक वेळा मोठ्या घटनांमध्ये नसतोच.

तो अचानक भेटलेल्या जुन्या मित्रात असतो.

सकाळी गॅलरीत येऊन बसलेल्या पक्ष्यात असतो.

नातवाने काढलेल्या वाकड्या-तिकड्या चित्रात असतो.

किंवा एखाद्या जुन्या फोटोसमोर उभं राहून नकळत उमटलेल्या स्मितहास्यात असतो.

कधी एखाद्या फळाच्या चवीत, कधी एखाद्या जुन्या अनुभवाच्या आठवणीत, 

तर कधी मनात अचानक जाग्या झालेल्या स्मृतीतही आनंद दडलेला असतो. 

त्या क्षणांना ओळखायचं की दुर्लक्ष करायचं, त्यांना जपायचं की 

निसटू द्यायचं, मात्र आपल्याच हातात असतं.

समस्या एवढीच की आपण आनंदाची वाट पाहतो ढोल, ताशांसह येणाऱ्या पाहुण्यासारखी, आणि तो येतो अनवाणी पावलांनी.

त्या बैलगाडीतल्या माणसाने गावाला काही दिलं नव्हतं. 

त्याने कुणाचं दु:ख दूर केलं नव्हतं. त्याने चमत्कारही केले नव्हते.

त्याने फक्त लोकांना त्यांच्या आयुष्यात आधीपासून असलेल्या छोट्या आनंदांकडे पुन्हा पाहायला शिकवलं.

आजूबाजूला पाहिलं तर जाणवतं की माणुसकीही अशीच असते. 

एखाद्याला दिलेला वेळ, मनापासून विचारलेली चौकशी, 

कारण नसताना केलेली मदत, किंवा कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा एक साधा शब्द, 

या सगळ्या गोष्टींची किंमत बाजारात मोजता येत नाही. पण त्यातूनच आयुष्य थोडं उबदार होतं.

कदाचित म्हणूनच त्या माणसाने आनंद विकला नाही.

त्याने फक्त बीजं वाटली. उरलेलं काम लोकांनी स्वतः केलं.

आजही कधी एखादी साधीशी गोष्ट मनाला स्पर्शून जाते, 

कधी एखाद्या आठवणीमुळे नकळत हसू येतं, कधी कोणीतरी कारण नसताना 

आपुलकी दाखवतो, तेव्हा त्या बैलगाडीची आठवण येते.

आणि वाटतं, आनंद विकत मिळत नाही. तो पेरावा लागतो.

आणि मग तो हळूहळू वाढत जातो.

एका बीजासारखा. 

कदाचित आनंद शोधायची गोष्ट नसतेच. तो बहुतेक वेळा आपल्या आसपासच असतो. फक्त धावपळ, अपेक्षा आणि काळज्यांच्या गर्दीत आपण त्याला विसरून जातो. अशा वेळी एखादा माणूस, एखादी आठवण, एखादं गाणं किंवा एखादा साधासुधा क्षण आपल्याला थांबवतो आणि त्या विसरलेल्या आनंदाची पुन्हा आठवण करून देतो.

अरुण काळे

जून २०२६

"वेलकम बॅक!"

  "वेलकम बॅक!" "वेलकम बॅक!" रडता रडता... डॉक्टरांचे शब्द कानावर पडले. माझंच स्वागत होत होतं. क्षणभर प्रश्न पडला... यांना...