Friday, June 19, 2026

एकाच सूर्याखाली

एकाच सूर्याखाली

माझ्या एका मित्राची एक गंमत आहे.

तो फोनवर बोलताना समोरच्या माणसाचा दर्जा, हुद्दा किंवा शिक्षण जवळजवळ अचूक ओळखतो आणि मग त्यानुसार आपले संभाषण सुरू करतो. बँकेचा व्यवस्थापक असेल तर आवाजात एक वेगळीच मृदुता येते. सरकारी अधिकारी असेल तर वाक्यांच्या शेवटी आदरार्थी प्रत्ययांची गर्दी होते, एखादा विमा विक्रेता किंवा चुकीचा नंबर असेल तर संभाषण तीस सेकंदांत संपते.

ही फक्त त्याचीच गोष्ट नाही.

आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात असे असतो. समोरचा माणूस कोण आहे हे कळल्याशिवाय त्याच्याशी कसे वागायचे हे आपण ठरवत नाही. त्याचे पद काय? तो किती मोठा आहे? त्याचा उपयोग काय?आणि सर्वांत महत्त्वाचे...

तो माझे काही काम करू शकतो का?

माणसाची ओळख करून घेण्यापूर्वी त्याचे व्हिजिटिंग कार्ड वाचण्याची आपल्याला सवय झाली आहे.

मात्र आयुष्याने मला काही वेगळे अनुभव दिले.

एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने कठीण प्रसंगी दिलासा दिला असेल, तर घरात काम करणाऱ्या बाईनेही तितक्याच मायेने आधार दिला आहे. मोठमोठी भाषणे ऐकायला मिळाली, पण कधी कधी दोन शब्दांत धीर देणारा सुरक्षा रक्षक अधिक लक्षात राहिला आहे.

पद मोठे असले म्हणजे माणूसही मोठा असतोच असे नाही. साधी नोकरी करणारा माणूस साधाच असेल असेही नाही.

वर्षानुवर्षे जगताना एक गोष्ट हळूहळू लक्षात येते. आपण भेटतो ती प्रत्येक व्यक्ती तिच्या पदापेक्षा मोठी असते.

कारण तिच्याही आयुष्यात चिंता असतात.तिच्याही काही स्वप्नांचा पाठलाग सुरू असतो. तिलाही कोणाची तरी काळजी असते.

तिच्याही मनात एखादी न बोललेली गोष्ट दडलेली असते. तिच्याही आयुष्यात काही जखमा असतात आणि काही आनंद जपून ठेवलेले असतात. अलीकडे एका रेखाटनाकडे पाहताना हाच विचार पुन्हा मनात आला.

वेगवेगळे आकार. वेगवेगळ्या उंची. वेगवेगळे स्वभाव. पण एकच जमीन.

एकच सूर्य.

तेव्हा जाणवले, निसर्गाला बहुधा दर्जे माहीत नसावेत. सूर्य उगवतो तेव्हा तो कोणावर जास्त आणि कोणावर कमी प्रकाश टाकत नाही. त्याचा प्रकाश सगळ्यांवर सारखाच पडतो.

वारा वाहतो तेव्हा तो पद विचारत नाही. पाऊस पडतो तेव्हा तो हुद्दा पाहत नाही.

ही विभागणी आपण करतो. आता मी लोकांना भेटताना त्यांचे पद लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो.


कारण पदे बदलतात. ओळखी बदलतात. व्हिजिटिंग कार्डे बदलतात.

पण माणूसपण बदलत नाही. आणि दिवसाच्या शेवटी...

आपण सारेच एकाच जमिनीवर चालतो आणि एकाच सूर्याखाली उभे असतो.


अरुण काळे

जून २०२६



Tuesday, June 16, 2026

पाणी शोधताना..

पाणी शोधताना...
एकदा एका चिमणीला तहान लागली.
ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती फडफडत खिडकीतून आत आली आणि त्या काचेच्या भांड्याच्या कडेवर जाऊन बसली.
आत डोकावून पाहते तो काय! तिला एक गोल्डफिश दिसला.अचानक आलेल्या त्या पाहुण्याकडे माशानेही आश्चर्याने पाहिले.
काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले.चिमणी गोंधळली.गोल्डफिशही चकित झाला.
खरे तर त्या गोल्डफिशलाही अधूनमधून या छोट्याशा काचेच्या समुद्राच्या बाहेरचे जग पाहायची उत्सुकता असे. निळे आकाश, पांढरे ढग, झाडांच्या फांद्या आणि त्यावर बसलेले पक्षी, हे सारे तो रोज काचेआडून पाहत असे आणि मनोमन त्यांचे स्वप्न रंगवत असे.
चिमणीनेच अखेर शांतता भंग केली.
"माफ करा," ती म्हणाली, "मी फक्त पाणी पाहून आत आले."
मासा हसला.
"आणि मी," तो म्हणाला, "या छोट्याशा समुद्रात आणि माझ्या एकांतात अगदी सुखी होतो. तुमच्या येण्याने माझा एकांत भंगला."
दरम्यान चिमणीच्या लक्षात आले की पाण्याची पातळी खूप खाली आहे. तिला तिची तहान भागवता येणार नव्हती.
माशालाही त्याचा एकांत परत मिळणार नव्हता.
दोघांचेही मनसुबे अपूर्ण राहिले.

आपलेही काहीसे असेच असते.
जीवनात फार थोड्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडतात.
गमतीची गोष्ट म्हणजे आपण मात्र आयुष्याने आपल्या मनातील पटकथेनुसारच वागावे अशी अपेक्षा करत राहतो.
चिमणीला पाणी हवे होते. माशाला एकांत.दोघांनाही हवे ते मिळाले नाही.

पण त्यांची भेट झाली.

अशा भेटी, अशा घटना, असे प्रसंग अनेकदा अनपेक्षित वाटतात. पण मागे वळून पाहताना 
जाणवते की त्या जणू पूर्वनियोजितच होत्या.
जर चिमणी थोडी शहाणी असेल तर ती हरवलेल्या पाण्याची तक्रार करत बसणार नाही. 
ती माशाकडून पाण्याखालच्या जगाच्या गोष्टी ऐकेल.
आणि मासा जर शहाणा असेल तर तो आलेल्या पाहुण्याला घाबरणार नाही. तो चिमणीकडून आकाशाच्या गोष्टी ऐकेल.
दोघेही तिथून थोडे अधिक समृद्ध होऊन निघतील.

आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडत असतात. काही माणसे अचानक भेटतात.
काही घटना अनपेक्षितपणे घडतात.

काही दारे नकळत उघडतात.
त्या क्षणी त्यांचा अर्थ कळत नाही. पण नंतर लक्षात येते की त्या प्रत्येक भेटीत, प्रत्येक प्रसंगात एखादा धडा दडलेला होता.
आपण एका गोष्टीची अपेक्षा करतो; आयुष्य मात्र दुसरेच काही समोर ठेवते. कदाचित त्यालाच जीवन म्हणत असावेत.
कारण कितीही प्रयत्न केला तरी काही पूर्वनियोजित गोष्टी आपण टाळू शकत नाही.त्या आपल्या आयुष्यात येतातच.
कधी चिमणी बनून.
कधी गोल्डफिश बनून.
आयुष्याच्या अनपेक्षित वळणांसाठी नेहमी तयार राहा

Sunday, June 14, 2026

मी एक फाईल...?


मी एक फाईल...?

माझ्या आयुष्यातील एक मोठा शोध नुकताच लागला.

मी माणूस नसून एक फाईल आहे.हा शोध अचानक लागलेला नाही. अनेक वर्षांच्या सरकारी, निमसरकारी, खासगी, वैद्यकीय, बँकिंग आणि सामाजिक अनुभवातून तो हळूहळू समोर आला.

जन्मल्याबरोबर माझी पहिली फाईल उघडली गेली असावी. जन्मदाखला, लसीकरण कार्ड, शाळेचा दाखला, गुणपत्रिका, ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट...

एक फाईल संपत नाही तोवर दुसरी.कधीकधी वाटते, आयुष्य कमी आणि कागदपत्रे जास्त. शाळेत प्रवेशासाठी फाईल.

कॉलेजसाठी फाईल. नोकरीसाठी फाईल.बँकेसाठी फाईल. घरासाठी फाईल.विमा, गुंतवणूक, इस्पितळ, प्रवास, सोसायटी, कर, वीज, गॅस...

जिकडे तिकडे फाईल. पूर्वी माणसे भेटली की "काय म्हणताय?" असे विचारायची. आता "कागद दिलेत का?" हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असतो.एखाद्या कार्यालयात गेल्यावर तर आपल्या अस्तित्वापेक्षा फाईलचे अस्तित्व महत्त्वाचे वाटू लागते.

"तुम्ही कोण?" या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे नसते. "फाईल नंबर काय?"

हा खरा प्रश्न असतो.

माझ्या लक्षात आले आहे की आपल्या देशात माणूस हरवला तर शोधायला वेळ लागेल; पण फाईल हरवली तर तातडीची बैठक बोलावली जाईल.

फाईल सापडली की काम सुरू. फाईल अडकली की आयुष्य अडकले. फाईल वर गेली की आशा वाढली.

फाईल खाली आली की पुन्हा नव्याने सुरुवात. 

कधी कधी मला वाटते, आपल्या आयुष्याचा एक गुप्त चरित्रकार असतो. तो म्हणजे फाईल.

आपण काय शिकलो, कुठे राहिलो, कुठे गेलो, किती कमावले, कोणत्या रुग्णालयात दाखल झालो,सगळे तिच्याकडे नोंदलेले असते.फक्त एकच गोष्ट कोणत्याही फाईलमध्ये सापडत नाही.

आपण किती हसलो. किती मित्र जोडले- पहिल्या प्रेमाची धडधड, मुलांच्या यशाचा आनंद, एखाद्या अपयशातून मिळालेली शिकवण, मनाजोगते पुस्तक वाचून झाल्यावर मनात रेंगाळणारी शांतता, किंवा बराच काळानंतर भेटलेल्या जिवाभावाच्या माणसाबरोबर घालवलेला एक तास... यापैकी कशाचीच नोंद कुठल्याच फाईलमध्ये नसते. आणि तरीही आयुष्याचा खरा हिशेब बहुतेक याच गोष्टींमध्ये किती वेळा मनापासून आनंद घेतला. किती लोकांच्या आठवणीत राहिलो.

ते जगले गेले पाहिजे.


अरुण काळे

जून २०२६

एकाच सूर्याखाली

एकाच सूर्याखाली माझ्या एका मित्राची एक गंमत आहे. तो फोनवर बोलताना समोरच्या माणसाचा दर्जा, हुद्दा किंवा शिक्षण जवळजवळ अचूक ओळखतो आणि मग त्यान...