Sunday, June 28, 2026

 

हसरी खेळकर झुळूक

रविवार सकाळ.

लवकर जाग आल्यामुळे बाल्कनीत गार वाऱ्याच्या झुळुकेशी बोलत उभा होतो. ती ऐकत नसावी. नाहीतर थांबली असती. पण नाही. तिचं येणं-जाणं मलाही सुखावह वाटत होतं.

हळूहळू तांबडं फोडत अरुणोदय महाराज, सूर्याजींना रथातून घेऊन येत होते. क्षणभर सूर्याजींना नमस्कार करून दर्शन घेतलं...

आणि अचानक मेंदू घसरला.(तो सरळ रस्त्याने फारसा चालतच नाही.)

माझ्या एका जिवाभावाच्या मैत्रिणीशी फोनवर झालेल्या संभाषणाकडे.




तसं पाहिलं तर त्या संभाषणाला काही अर्थ नव्हता... आणि म्हणूनच ते इतकं सुंदर होतं.

तिच्याकडून स्वतःचीच स्तुती सुरू होती आणि ती माझ्या कानावर आदळत होती.

किती वेळ ऐकली, विचारू नका. शेवटी थोडा वैतागून मीच तिला थांबवलं.

"ऐक...

तू मोठी... तुझी बुद्धी मोठी...

मी लहान...माझी बुद्धी लहान.

तुझं हृदय मोठं. ते म्हणतात ना... दिल दरिया... की काय ते.

आणि माझं?तुझ्या हृदयापुढे लॅपटॉपवर दिसणाऱ्या त्या छोट्याशा ❤️ इमोजीएवढंसुद्धा नाही.

आणि ऐक...

तुझ्याशी माझी तुलना करणं म्हणजे मुंगीने हत्तीला म्हणावं—'मी तुझ्यापेक्षा जास्त वजन उचलते!'

तू आहेस तशीच मोठी राहा.

मला लहान असल्याचं अजिबात दुःख नाही.

कारण...

साधं आणि सोपं सांगायचं तर...तू माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस."

क्षणभर शांतता.

मग मी म्हटलं, "एक पी. जे. मारू?"

"मार."

"ऐक...

माझ्या भावाचं नाव 'जिवा' आहे."

क्षणभर शांतता...

आणि मग ती खळखळून हसायला लागली.

मीसुद्धा.

झुळूक मात्र सगळं ऐकूनही काही न बोलता हसत फिरत होती.

Thursday, June 25, 2026

पुढच्या गुरुवारी

 हॅलो! कसा आहेस? बरा आहेस ना?



मग झालं. मी...  मी सध्या बाल्कनीत उभा आहे.


माउंट फुजी पाहतोय.

खरंच... घाबरू नकोस. माझी तब्येत अजून बरी आहे.

दार्जिलिंग, जपान किंवा हिमालयात जायचीही गरज पडलेली नाही.

तो इथूनच दिसतोय. माझ्या बाल्कनीतून.थोडी कल्पनाशक्ती आणि थोडं मावळतीचं ऊन मिळालं 

"इथून पाहिलंसकी समोरचा डोंगर अगदी माउंट फुजीसारखा दिसायला लागतो..."

 "बरं! सांग, तुझ्याकडे वेळ आहे का?"

"आहे. आकाशाएवढा." "म्हणजे?""सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत."

"राईट. ठीक आहे. मी येतो पुढच्या गुरुवारी. तयार रहा मात्र.

"वाट पाहता पाहता मला उशीर झाला तर?"

"जा निघून. तू वाट तरी किती पाहणार?" "तू काय, मी काय? वाट पाहता पाहता म्हातारे होणार..."

"झालोच आहोत."

"इतका थोडाच उशीर होणार?" "झाला तर जास्तीत जास्त अठरा मिनिटं." 

"अठराच का?" "सव्वीस का नाही?"

"माहीत नाही." "बहुतेक मेंदूने अठरा हा आकडा काढून माझ्या हातात ठेवला असावा."

"अलिकडे तो असले उद्योग करतो."

ट्रॅफिकवर आपलं थोडंच नियंत्रण असतं. आजकाल बघावं तिथे उशीरच करतायत. 

गाडी असो.ट्रेन असो.वा घोडा असो. अलिकडे सूर्योदयाची वेळ निघून गेली तरी सूर्याजी  महाराजांचा पत्ता नसतो. 

युद्धाच्या धुरामुळे वाट सापडत नसावी.

नाहीतर एवढा उशीर कशाला?

हल्ली  उबर करणाऱ्यालाही उबर मिळेपर्यंत उशीरच होत असतो.

अरे गाढवा, जागा हो!

मेंदू तुझा पूर्ण विस्कटलाय."पण काही झालं तरी पुढचा गुरुवार लक्षात ठेव.

दत्तजयंती देखील आहे."

"नक्की!"

"उशीर करू नकोस हं."

"प्रयत्न करीन."

"प्रयत्न नाही. ये."

"नक्की!"पुढच्या गुरुवारी, मी बाल्कनीत उभा आहे,माउंट फुजी पाहत.

वाट पाहत. किंवा कदाचित वाट न पाहताच.

Tuesday, June 23, 2026

आनंदाचे बीज

आनंदाचे बीज

काही माणसं आयुष्यात येतात आणि निघून जातात. 

काही दिवसांनी त्यांची नावंसुद्धा आठवत नाहीत. 

काही जण असे असतात की ते निघून गेल्यानंतरही 

त्यांची उपस्थिती आपल्या मनात कुठेतरी रेंगाळत राहते.

आमच्या गावात  एक असाच एक माणूस आला होता.

तो एका जुन्या बैलगाडीतून आला. गाडीवर एक विचित्र फलक लटकत होता

(हा माणूस खरंच आमच्या गावात आला होता की माझ्या मनात, हे आज सांगता येणार नाही. पण त्याने विचारलेला प्रश्न अजूनही माझ्या मागे फिरतो. आनंद मिळवायचा असतो की आठवण करून द्यायची असते?)

"आनंद विकत मिळेल."

गावकऱ्यांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

"आनंद कुठे विकत मिळतो?" कुणी हसत विचारलं.

पण तो माणूस फक्त हसला.

"मी आनंद विकत नाही," तो म्हणाला, ""मी आनंद विकत नाही," तो म्हणाला, 


"लोकांच्या मनात आधीपासून असलेल्या आनंदाची फक्त त्यांना आठवण करून देतो.""

त्याच्या गाडीत काही विलक्षण नव्हतं. काही रंगीत काचा, 

काही दुमडलेले कागद, काही मातीच्या चकत्या. 

जणू एखाद्या जुन्या खचखोळात वर्षानुवर्षे साचलेल्या वस्तूंचा खजिनाच.

पण त्या प्रत्येक वस्तूत एखाद्या आठवणीची, एखाद्या भावनेची किंवा 

विस्मरणात गेलेल्या आनंदाची दारं उघडण्याची ताकद होती.

गावाच्या टोकाला राहणाऱ्या एका एकाकी स्त्रीने 

त्याच्याकडून एक चिठ्ठी घेतली. त्यावर लिहिलं होतं,

"दिव्याची गरज नसली तरी एक दिवा लावून ठेवा. आणि एखाद्याचं नाव प्रेमाने घ्या, जरी तो ऐकण्यासाठी जवळ नसला तरी."

त्या रात्री तिने अनेक वर्षांनी आपल्या दिवंगत नवऱ्याचं नाव मोठ्याने घेतलं. दु:खाने नाही, तर कृतज्ञतेने.

आणि इथूनच मला त्या गोष्टीचा खरा अर्थ समजू लागतो.

आपण बहुतेक जण आनंदाच्या शोधात असतो. पण गंमत म्हणजे 

तो शोधताना आपण त्याला सतत आपल्यापासून दूर ढकलत असतो. 

आपल्याला वाटतं, अजून थोडे पैसे मिळाले की आनंद येईल. 

अजून थोडं यश मिळालं की आनंद मिळेल. लोकांनी आपली दखल घेतली की, 

आपली स्वप्नं पूर्ण झाली की, आपल्याला हवं ते मिळालं की आपण आनंदी होऊ.

पण आयुष्य वारंवार वेगळंच काहीतरी शिकवतं.

आनंद बहुतेक वेळा मोठ्या घटनांमध्ये नसतोच.

तो अचानक भेटलेल्या जुन्या मित्रात असतो.

सकाळी गॅलरीत येऊन बसलेल्या पक्ष्यात असतो.

नातवाने काढलेल्या वाकड्या-तिकड्या चित्रात असतो.

किंवा एखाद्या जुन्या फोटोसमोर उभं राहून नकळत उमटलेल्या स्मितहास्यात असतो.

कधी एखाद्या फळाच्या चवीत, कधी एखाद्या जुन्या अनुभवाच्या आठवणीत, 

तर कधी मनात अचानक जाग्या झालेल्या स्मृतीतही आनंद दडलेला असतो. 

त्या क्षणांना ओळखायचं की दुर्लक्ष करायचं, त्यांना जपायचं की 

निसटू द्यायचं, मात्र आपल्याच हातात असतं.

समस्या एवढीच की आपण आनंदाची वाट पाहतो ढोल, ताशांसह येणाऱ्या पाहुण्यासारखी, आणि तो येतो अनवाणी पावलांनी.

त्या बैलगाडीतल्या माणसाने गावाला काही दिलं नव्हतं. 

त्याने कुणाचं दु:ख दूर केलं नव्हतं. त्याने चमत्कारही केले नव्हते.

त्याने फक्त लोकांना त्यांच्या आयुष्यात आधीपासून असलेल्या छोट्या आनंदांकडे पुन्हा पाहायला शिकवलं.

आजूबाजूला पाहिलं तर जाणवतं की माणुसकीही अशीच असते. 

एखाद्याला दिलेला वेळ, मनापासून विचारलेली चौकशी, 

कारण नसताना केलेली मदत, किंवा कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा एक साधा शब्द, 

या सगळ्या गोष्टींची किंमत बाजारात मोजता येत नाही. पण त्यातूनच आयुष्य थोडं उबदार होतं.

कदाचित म्हणूनच त्या माणसाने आनंद विकला नाही.

त्याने फक्त बीजं वाटली. उरलेलं काम लोकांनी स्वतः केलं.

आजही कधी एखादी साधीशी गोष्ट मनाला स्पर्शून जाते, 

कधी एखाद्या आठवणीमुळे नकळत हसू येतं, कधी कोणीतरी कारण नसताना 

आपुलकी दाखवतो, तेव्हा त्या बैलगाडीची आठवण येते.

आणि वाटतं, आनंद विकत मिळत नाही. तो पेरावा लागतो.

आणि मग तो हळूहळू वाढत जातो.

एका बीजासारखा. 

कदाचित आनंद शोधायची गोष्ट नसतेच. तो बहुतेक वेळा आपल्या आसपासच असतो. फक्त धावपळ, अपेक्षा आणि काळज्यांच्या गर्दीत आपण त्याला विसरून जातो. अशा वेळी एखादा माणूस, एखादी आठवण, एखादं गाणं किंवा एखादा साधासुधा क्षण आपल्याला थांबवतो आणि त्या विसरलेल्या आनंदाची पुन्हा आठवण करून देतो.

अरुण काळे

जून २०२६

Friday, June 19, 2026

एक विश्वगीत का नसावे?

 

एक विश्वगीत का नसावे?

आपण अनेक राष्ट्रांचे नागरिक असलो, तरी एका पृथ्वीची लेकरं आहोत.


काही दिवसांपूर्वी फिफा विश्वचषकाचा सामना पाहत बसलो होतो.

खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांची राष्ट्रगीते वाजत होती. खेळाडू अभिमानाने उभे होते. प्रेक्षकही.

आणि तसे व्हायलाच हवे. राष्ट्रगीत म्हणजे देशाचा आत्मा. आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि मातृभूमीबद्दलच्या प्रेमाची अभिव्यक्ती.

पण तेवढ्यात मनात एक वेडा विचार चमकून गेला.

प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत असते... मग संपूर्ण मानवजातीचे एखादे विश्वगीत का नसावे?

आज पृथ्वीवर जवळजवळ दोनशे देश आहेत. दोनशे ध्वज.दोनशे राष्ट्रगीते. दोनशे वेगळ्या ओळखी.

पण पृथ्वी किती? एकच. सूर्य किती? एकच. चंद्र किती? एकच.मानवजात? तीसुद्धा एकच.

मग या एकत्वाचे प्रतीक असणारे एखादे गीत का नसावे?

अंतराळातून पृथ्वीचा फोटो पाहिला की कुठेही सीमा दिसत नाहीत. ना भारत. ना अमेरिका. ना चीन. ना रशिया.

एक निळा ग्रह. 

एक घर. सगळ्यांचे समान घर. विश्वचषकाच्या मैदानावर प्रत्येक देशाचा ध्वज फडकतो.

तो फडकायलाच हवा. कारण विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. मला राष्ट्रध्वज नाहीसे व्हावेत असे वाटत नाही.

मला राष्ट्रगीतेही नाहीशी व्हावीत असे वाटत नाही. उलट ती राहावीत. पण त्या सगळ्यांच्या पलीकडे आपल्याला जोडणारे एक प्रतीक असावे असे वाटते. एक पृथ्वीचा ध्वज. एक विश्वगीत.

कल्पना करा... फिफा विश्वचषकाची अंतिम फेरी. सर्व देशांचे खेळाडू मैदानावर उभे आहेत. त्यांच्या मागे त्यांच्या देशांचे ध्वज आहेत.

प्रेक्षकांमध्ये जगभरातील लोक बसले आहेत. खेळ सुरू होण्यापूर्वी संपूर्ण स्टेडियममध्ये एक गीत घुमते.असे गीत जे कोणत्याही एका देशाचे नसून संपूर्ण पृथ्वीचे आहे. असे गीत जे भाषा, धर्म, वंश, सीमा यांच्यापलीकडे जाते.

असे गीत जे फक्त एवढेच सांगते—"आपण वेगळे असलो तरी आपण एक आहोत."

"We Are The World" हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा ते फक्त एक सुंदर गाणे वाटले होते.आज वाटते, ते एका विश्वगीताच्या कल्पनेच्या सर्वात जवळ गेलेले गीत असावे. कारण ते देशांविषयी बोलत नाही. ते माणसांविषयी बोलते. ते आपल्याला आठवण करून देते की आपली दुःखे, आशा, स्वप्ने आणि भीती यांना सीमा नसतात.

आपण राष्ट्रगीत ऐकतो तेव्हा उभे राहतो. कारण आपण आपल्या देशाचा सन्मान करतो.

पण एखादे विश्वगीत असते तर? आपण उभे राहिलो असतो का? त्या क्षणी आपण भारतीय, अमेरिकन, जपानी किंवा ब्राझिलियन नसतो. आपण फक्त पृथ्वीवासी असतो.

कदाचित माझी ही कल्पना कधीच प्रत्यक्षात येणार नाही. कदाचित प्रत्येक देश आपापल्या राष्ट्रगीतांमध्येच रमून जाईल.

तसे असण्यात काही गैरही नाही.पण पुढच्या वेळी विश्वचषकाच्या मैदानावर राष्ट्रगीत ऐकताना माझ्या मनात एक प्रश्न नक्की येईल...जर प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत असू शकते, तर संपूर्ण मानवजातीचे एक विश्वगीत का नसावे?

आणि ते गीत कोणते असेल? माझ्यासाठी त्याचे उत्तर अनेक वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे—

"We Are the World..."कारण अखेरीस आपण अनेक देशांचे नागरिक असलो, तरी एका पृथ्वीची लेकरं आहोत.

आणि कदाचित जगाला एका जागतिक सरकारची नाही, एका जागतिक चलनाची नाही, तर एकमेकांची आठवण करून देणाऱ्या एका विश्वगीताची गरज आहे.  

अरुण काळे

जून २०२६



एकाच सूर्याखाली

एकाच सूर्याखाली

माझ्या एका मित्राची एक गंमत आहे.

तो फोनवर बोलताना समोरच्या माणसाचा दर्जा, हुद्दा किंवा शिक्षण जवळजवळ अचूक ओळखतो आणि मग त्यानुसार आपले संभाषण सुरू करतो. बँकेचा व्यवस्थापक असेल तर आवाजात एक वेगळीच मृदुता येते. सरकारी अधिकारी असेल तर वाक्यांच्या शेवटी आदरार्थी प्रत्ययांची गर्दी होते, एखादा विमा विक्रेता किंवा चुकीचा नंबर असेल तर संभाषण तीस सेकंदांत संपते.

ही फक्त त्याचीच गोष्ट नाही.

आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात असे असतो. समोरचा माणूस कोण आहे हे कळल्याशिवाय त्याच्याशी कसे वागायचे हे आपण ठरवत नाही. त्याचे पद काय? तो किती मोठा आहे? त्याचा उपयोग काय?आणि सर्वांत महत्त्वाचे...

तो माझे काही काम करू शकतो का?

माणसाची ओळख करून घेण्यापूर्वी त्याचे व्हिजिटिंग कार्ड वाचण्याची आपल्याला सवय झाली आहे.

मात्र आयुष्याने मला काही वेगळे अनुभव दिले.

एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याने कठीण प्रसंगी दिलासा दिला असेल, तर घरात काम करणाऱ्या बाईनेही तितक्याच मायेने आधार दिला आहे. मोठमोठी भाषणे ऐकायला मिळाली, पण कधी कधी दोन शब्दांत धीर देणारा सुरक्षा रक्षक अधिक लक्षात राहिला आहे.

पद मोठे असले म्हणजे माणूसही मोठा असतोच असे नाही. साधी नोकरी करणारा माणूस साधाच असेल असेही नाही.

वर्षानुवर्षे जगताना एक गोष्ट हळूहळू लक्षात येते. आपण भेटतो ती प्रत्येक व्यक्ती तिच्या पदापेक्षा मोठी असते.

कारण तिच्याही आयुष्यात चिंता असतात.तिच्याही काही स्वप्नांचा पाठलाग सुरू असतो. तिलाही कोणाची तरी काळजी असते.

तिच्याही मनात एखादी न बोललेली गोष्ट दडलेली असते. तिच्याही आयुष्यात काही जखमा असतात आणि काही आनंद जपून ठेवलेले असतात. अलीकडे एका रेखाटनाकडे पाहताना हाच विचार पुन्हा मनात आला.

वेगवेगळे आकार. वेगवेगळ्या उंची. वेगवेगळे स्वभाव. पण एकच जमीन.

एकच सूर्य.

तेव्हा जाणवले, निसर्गाला बहुधा दर्जे माहीत नसावेत. सूर्य उगवतो तेव्हा तो कोणावर जास्त आणि कोणावर कमी प्रकाश टाकत नाही. त्याचा प्रकाश सगळ्यांवर सारखाच पडतो.

वारा वाहतो तेव्हा तो पद विचारत नाही. पाऊस पडतो तेव्हा तो हुद्दा पाहत नाही.

ही विभागणी आपण करतो. आता मी लोकांना भेटताना त्यांचे पद लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांचे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो.


कारण पदे बदलतात. ओळखी बदलतात. व्हिजिटिंग कार्डे बदलतात.

पण माणूसपण बदलत नाही. आणि दिवसाच्या शेवटी...

आपण सारेच एकाच जमिनीवर चालतो आणि एकाच सूर्याखाली उभे असतो.


अरुण काळे

जून २०२६



Tuesday, June 16, 2026

पाणी शोधताना..

पाणी शोधताना...
एकदा एका चिमणीला तहान लागली.
ती खिडकीवर येऊन बसली. आत डोकावून पाहते तर एका काचेच्या भांड्यात पाणी दिसले. पाणी पाहताच तिच्या जीवात जीव आला. ती फडफडत खिडकीतून आत आली आणि त्या काचेच्या भांड्याच्या कडेवर जाऊन बसली.
आत डोकावून पाहते तो काय! तिला एक गोल्डफिश दिसला.अचानक आलेल्या त्या पाहुण्याकडे माशानेही आश्चर्याने पाहिले.
काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले.चिमणी गोंधळली.गोल्डफिशही चकित झाला.
खरे तर त्या गोल्डफिशलाही अधूनमधून या छोट्याशा काचेच्या समुद्राच्या बाहेरचे जग पाहायची उत्सुकता असे. निळे आकाश, पांढरे ढग, झाडांच्या फांद्या आणि त्यावर बसलेले पक्षी, हे सारे तो रोज काचेआडून पाहत असे आणि मनोमन त्यांचे स्वप्न रंगवत असे.
चिमणीनेच अखेर शांतता भंग केली.
"माफ करा," ती म्हणाली, "मी फक्त पाणी पाहून आत आले."
मासा हसला.
"आणि मी," तो म्हणाला, "या छोट्याशा समुद्रात आणि माझ्या एकांतात अगदी सुखी होतो. तुमच्या येण्याने माझा एकांत भंगला."
दरम्यान चिमणीच्या लक्षात आले की पाण्याची पातळी खूप खाली आहे. तिला तिची तहान भागवता येणार नव्हती.
माशालाही त्याचा एकांत परत मिळणार नव्हता.
दोघांचेही मनसुबे अपूर्ण राहिले.

आपलेही काहीसे असेच असते.
जीवनात फार थोड्या गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडतात.
गमतीची गोष्ट म्हणजे आपण मात्र आयुष्याने आपल्या मनातील पटकथेनुसारच वागावे अशी अपेक्षा करत राहतो.
चिमणीला पाणी हवे होते. माशाला एकांत.दोघांनाही हवे ते मिळाले नाही.

पण त्यांची भेट झाली.

अशा भेटी, अशा घटना, असे प्रसंग अनेकदा अनपेक्षित वाटतात. पण मागे वळून पाहताना 
जाणवते की त्या जणू पूर्वनियोजितच होत्या.
जर चिमणी थोडी शहाणी असेल तर ती हरवलेल्या पाण्याची तक्रार करत बसणार नाही. 
ती माशाकडून पाण्याखालच्या जगाच्या गोष्टी ऐकेल.
आणि मासा जर शहाणा असेल तर तो आलेल्या पाहुण्याला घाबरणार नाही. तो चिमणीकडून आकाशाच्या गोष्टी ऐकेल.
दोघेही तिथून थोडे अधिक समृद्ध होऊन निघतील.

आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग घडत असतात. काही माणसे अचानक भेटतात.
काही घटना अनपेक्षितपणे घडतात.

काही दारे नकळत उघडतात.
त्या क्षणी त्यांचा अर्थ कळत नाही. पण नंतर लक्षात येते की त्या प्रत्येक भेटीत, प्रत्येक प्रसंगात एखादा धडा दडलेला होता.
आपण एका गोष्टीची अपेक्षा करतो; आयुष्य मात्र दुसरेच काही समोर ठेवते. कदाचित त्यालाच जीवन म्हणत असावेत.
कारण कितीही प्रयत्न केला तरी काही पूर्वनियोजित गोष्टी आपण टाळू शकत नाही.त्या आपल्या आयुष्यात येतातच.
कधी चिमणी बनून.
कधी गोल्डफिश बनून.
आयुष्याच्या अनपेक्षित वळणांसाठी नेहमी तयार राहा

  हसरी खेळकर झुळूक रविवार सकाळ. लवकर जाग आल्यामुळे बाल्कनीत गार वाऱ्याच्या झुळुकेशी बोलत उभा होतो. ती ऐकत नसावी. नाहीतर थांबली असती. पण नाही...