गुलमोहर
कसे कळते गुलमोहराला
कधी लाजावे, लालबुंद होऊन खुलावे?
आकाश अजून असताना कोरडे,
लागतो त्यास कसा हो ठाव?
पावसाच्या पहिल्या चाहुलीचा
कसा ऐकतो तो भाव?
कुठल्या अदृश्य हाकेने,
कोणासाठी तो सजतो खास?
भर उन्हातही फुलून जातो,
उधळीत रंगांचा सुवास.
असो वैशाख, असो अधिकमास,
जरी उन्हाचा तडाखा प्रखर;
तरीही डौलाने मिरवत राहतो
स्वतःचा लालबुंद साज सुंदर.
म्हणूनच कदाचित गुलमोहर
आशेचा वृक्ष वाटतो मला नेहमी.
अनुकूल परिस्थितीची वाट न पाहता,
स्वतःच्या ऋतूत, स्वतःच्या वेळेवर,
न चुकता फुलून येतो हा गुलमोहर.
गुलमोहराकडे पाहिले की मला नेहमी एक प्रश्न पडतो. इतर अनेक वृक्ष सावली देतात, फळे देतात, ऋतूनुसार बहरतात; पण गुलमोहराचे काहीतरी वेगळेच असते. उन्हाळ्याच्या कडक झळा अंगावर घेत असतानाच तो अचानक लालबुंद फुलांनी उजळून निघतो. जणू त्याला येणाऱ्या पावसाची चाहूल आधीच लागलेली असते.
जीवनातही असेच घडत असावे. अनेकदा आपण योग्य वेळेची, योग्य संधीची, अनुकूल परिस्थितीची वाट पाहत राहतो. काही स्वप्ने पूर्ण व्हायला उशीर होतो. काही योजना अपेक्षेप्रमाणे आकार घेत नाहीत. काही दारे ठोठावूनही उघडत नाहीत. तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आशेचा एक धागा जिवंत राहतो.
गुलमोहर कदाचित याच गोष्टीची आठवण करून देतो. फुलण्यासाठी त्याला परिपूर्ण वातावरणाची गरज नसते. तो आपल्या वेळेवर फुलतो. त्याच्या उमलण्यामागे ऋतूंचे गणित असतेच; पण त्याहून महत्त्वाची असते त्याची अंतःप्रेरणा.
म्हणूनच गुलमोहर मला केवळ एक वृक्ष वाटत नाही. तो प्रतीक्षेचा, संयमाचा आणि आशेचा दूत वाटतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपली वेळ येईल, आपला ऋतू येईल, आणि तेव्हा आपणही आपल्या पूर्ण रंगांनी फुलू — हा विश्वास तो शांतपणे देत राहतो.
कदाचित म्हणूनच दरवर्षी लालबुंद फुलांनी बहरलेला गुलमोहर दिसला की मनात एकच विचार उमटतो —
"ऋतू उशिरा येऊ शकतात; पण उमलणे कधीच थांबत नाही."
No comments:
Post a Comment